रत्नागिरी : तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शहराजवळील भगवती किल्ला येथील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्र किनारी आढळला. अमोल संजय किड्ये (वय ३०, रा. मांडवी, रत्नागिरी) असे मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज (९ एप्रिल) सायंकाळी चारच्या सुमारास निदर्शनास आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल किड्ये हा तीन दिवसांपासून आपल्या राहत्या घरातून निघून गेला होता. त्यानंतर गुरुवारी त्याचा मृतदेह भगवती किल्ला येथील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्र किनारी रेलिंगच्या बाहेरील बाजूस समुद्र किनारी नागरिकांना आढळला.
अमोलची गाडी भगवतीबंदर येथे चावीसह उभी आहे. स्थानिक नागरिकांनी त्याचा मृतदेह समुद्रातून बाहेर रोपवेच्या आधारे काढला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत. दरम्यान, अमोल किड्ये यांने आत्महत्या केली की घातपात आहे याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती.





