भारतातील पहिला प्रयोग! रत्नागिरीत सुरू होणार ‘स्वॅम्प पोलीस’ गस्त; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज उद्घाटन

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी : सागरी सुरक्षेला अधिक बळकट करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले असून पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून भारतात पहिल्यांदाच ‘स्वॅम्प पोलीस’ गस्त उपक्रम राबवण्यात येणार आहे. या विशेष उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री तथा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज शुक्रवारी दुपारी ४ वाजता नारायणमळी, नाचणे येथे पार पडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून अनेक ठिकाणी खाडीकिनारे, घनदाट कांदळवन आणि दलदलीचे अत्यंत संवेदनशील भाग आहेत. अशा दुर्गम आणि चिखलाच्या भागात पारंपरिक बोटी किंवा वाहनांद्वारे गस्त घालणे पोलिसांसाठी मोठे आव्हानात्मक ठरत होते. यावर प्रभावी उपाय म्हणून आता कायक बोट माध्यमातून ही गस्त घातली जाणार आहे.

या मोहिमेसाठी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना विशेष प्रशिक्षण दिले जात असून पोलीस अधीक्षक बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कायक चालवणे, दलदलीत गस्त घालणे आणि आपत्कालीन बचावकार्य करण्याचे तंत्र पोलीस कर्मचारी आत्मसात करत आहेत. कायक बोटींमुळे अगदी अरुंद खाड्या आणि कांदळवनांच्या आतपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे, ज्यामुळे लपून चालणाऱ्या अवैध हालचालींवर जरब बसेल. दलदलीच्या भागात एखादी दुर्घटना घडल्यास किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास ‘स्वॅम्प पोलीस’ अत्यंत वेगाने प्रतिसाद देऊ शकतील. हा उपक्रम केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी एक आदर्श मॉडेल ठरणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने किनारपट्टीवरील संशयास्पद हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात बचावकार्य करण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरणार असून या प्रयोगामुळे रत्नागिरी पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *