पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे आश्वासन
अजय सावंत / रत्नागिरी : मिऱ्या–नागपूर महामार्गाचे काम प्रगतीपथावर असले तरी बाजूच्या सर्विस रोडचे अपूर्ण काम स्थानिकांसाठी गंभीर समस्या ठरत आहे. जेके फाईल परिसर, नाचणे येथील टीआरपी तसेच गणेश कॉलनी ते जेके फाईल दरम्यानचा सर्विस रोड अद्याप अपूर्ण असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना दररोज अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या प्रश्नाबाबत यापूर्वीही आवाज उठवण्यात आला होता. स्थानिकांनी महामार्ग अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काम पूर्ण करण्याची मागणी केली होती.
मात्र, कामात कोणतीही ठोस प्रगती न झाल्याने नाराजी वाढत होती.अखेर आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य संकेत कदम यांनी पुढाकार घेत १ मे रोजी सकाळी ११.३० वाजता नाचणे येथील टीआरपी येथे महामार्ग अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. यावेळी महामार्ग अधिकारी राकेश सैनी यांना सर्विस रोड अपूर्ण असल्यामुळे स्थानिकांना व वाहनचालकांना भेडसावणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती देण्यात आली.पावसाळ्यापूर्वी सर्विस रोड तसेच गटारांची कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असे प्रशासक तथा सरपंच ऋषिकेश भोंगले यांनी स्पष्ट केले.यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, तसेच स्थानिक रहिवासी मांडवकर, महादेव कदम, भागवत, भाई कोळवणकर, सावंत, दीपक कदम, ऋषिकेश वाघधरे, प्रतीक शेट्ये, ऋषिकेश शिवगण, सिद्ध पाटोळे, अनिकेत बामणे, गुंड्या कानसरे, गुरू नांदगावकर, जयेश पटेल, प्रथमेश पटेल, फणसेकर, प्रथमेश सावंत, दीपराज कदम आणि युवा सेनेचे रोहित सावंत उपस्थित होते.





