लांजा : तालुक्यातील देवधे मणचेकरवाडी परिसरात गव्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी गंभीर समस्या बनली असून मागील आठ दिवसांपासून गव्यांच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या कळपामुळे आंबा व काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे आठ ते दहा गव्यांचा कळप सातत्याने शेतांमध्ये वावरताना दिसत आहे. या गव्यांनी आंबा आणि काजूच्या झाडांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली असून ऐन हंगामातच झालेले हे नुकसान शेतकऱ्यांच्या आर्थिक कंबरड्यावर आघात करणारे ठरले आहे.
गव्यांच्या वाढत्या हालचालीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा तसेच रात्रीही गवे मुक्तपणे फिरत असल्याने शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. परिणामी, बागांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागरण करण्याची वेळ येत आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने हस्तक्षेप करून गव्यांचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी देवधे मणचेकरवाडीतील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.






