रत्नागिरी : रत्नागिरीतील पेट्रोलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने मागील दोन दिवसांपासून शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. अशातच काही पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्याचे फलक झळकल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
मध्य पूर्वेत युद्ध सुरु आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडून सातत्याने इराणवर हल्ला केला जात आहे. इराणनेही प्रत्युत्तर देत आखाती देशांमध्ये असणाऱ्या अमेरिकेन लष्करी तळांवर हल्ले केले. या युद्धामुळे जगभरातील कच्चा तेलाची पुरवठा साखळी खंडित झाली आहे. कारण अनेक तेलवाहू जहाजांवरही हल्ले केले जात आहेत. अशातच आता भारतासह जगभरातील देशांमध्ये कच्च्या तेलाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढण्याची किंवा इंधन संपण्याची अफवा पसरली आहे. यापूर्वी देखील यासंबंधीचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यामुळे शहरांमधील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
आता मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा रत्नागिरीतील पेट्रोल पंपावर वाहन धारकांनी गर्दी सुरू केली आहे. लॉकडाउन सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अनेकांच्या मनात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक वाहनधारक वाहनांमध्ये पेट्रोल भरून ठेवण्यासाठी गर्दी करत आहे. अशातच शहरातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्याचे फलक बुधवारी झळकल्याने अनेकांची गैरसमजूत झाली आणि पेट्रोल उपलब्ध असलेल्या पंपावर मोठी गर्दी झाली. मात्र प्रशासनाने पेट्रोलचा कोणताही तुटवडा नसल्याचे जाहीर केले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.
रत्नागिरीत पेट्रोलसाठी पुन्हा रांगा; पुरवठा विस्कळीत झाल्याने टंचाई







