रत्नागिरी: रत्नागिरी शहरालगत असलेल्या मिरजोळे एमआयडीसी भागातील रेल्वे पुलावर वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत एका अनोळखी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आज सोमवारी रात्री ८ वाजता हा अपघात घडला. सुमारे ६० वर्षे वय असलेल्या या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस आणि आरपीएफच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहाची झडती घेतली असता ओळखीचा कोणताही पुरावा न मिळाल्याने पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला आहे. या संदर्भात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची ओळख पटवण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली असून नागरिकांना काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.







