गुहागर : गुहागर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांचा संयुक्त जयंती महोत्सव व बौद्धजन सहकारी संघाचा अमृत महोत्सव राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी उदय सामंत ह्यांच्या हस्ते संस्थेच्या अमृत महोत्सवी वाटचालीचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशनही केले.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित समाजबांधवांशी संवाद साधला. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचे विचार केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवजातीला दिशा देणारे आहेत. बौद्धजन सहकारी संघाने ७५ वर्षांच्या प्रवासात समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचे आणि सहकाराच्या माध्यमातून प्रगती साधण्याचे जे कार्य केले आहे, ते अभिमानास्पद आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहचवण्यासाठी महायुती सरकार कटिबध्द असल्याचेही उदय सामंत ह्यांनी बोलताना नमूद केले.
या महोत्सवाला अध्यक्ष सुरेश सावंत, अध्यक्ष (मुंबई) अशोक कदम, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, कार्याध्यक्ष (मुंबई) दिपक मोहिते, राजेशजी बेंडल, पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार परिक्षित पाटील, नगराध्यक्षा नीता भालप यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, बौद्धजन सहकारी संघाचे सभासद आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.






