GRAMIN SEARCH BANNER

आंबा, काजू बागायतदारांसाठी महसूल मंत्र्यांचे आश्वासन तरीही ‘वर्षा’वर धडक मोर्चा : राजू शेट्टी

Gramin Varta
4 Views

मुंबई: राज्याचे महसूलमंत्री उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरीही यापुर्वीचा अनुभव पाहता अडीच महिने आंबा व काजू उत्पादक शेतकरी रस्त्यावरची लढाई सुरू आहे.

तरीही राज्य सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने आंबा व काजू बागायतदार १५ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी धडक देणारच असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली १५ मे रोजी होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभुमिवर कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांची व संघटनांची मंत्रालयात बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि , राज्य सरकार विमा कंपनीकडून जाचक अटी व नियमांमुळे पैसे मिळवून देईना ,त्याबरोबरच एनडीआरएफ कडे कोणतीही मदत मागितली नसून तसा प्रस्तावही सादर केलेला नाही. प्रशासन व राज्य सरकारकडून पंचनाम्याच्याबाबतीत कागदी घोडे नाचवले जात आहे. राज्य सरकारने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदतीबाबत वेळकाढूपणा करू लागले आहेत.

मा. खासदार विनायक राऊत बोलताना म्हणाले कि कोकणातील शेतकरी आता आत्महत्या करू लागले आहेत. फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संकटात टाकले जात आहे. यामुळे राज्य सरकारने मदतीबाबत आपली भुमिका स्पष्ट करावी.

आमदार भाई जगताप बोलताना म्हणाले कि , आंबा व काजू हे पिक कोकणातील शेतकऱ्यांचे नगदी पिक म्हणून ओळखले जात आहे. यंदाच्यावर्षी हवामानातील बदल , अवकाळी पाऊस या कारणांमुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. पंचनामे करण्याबाबत यंत्रणा अपुरी पडली आहे यामुळे अजून ५० टक्के पंचनामे पुर्ण झालेले नाहीत.

दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पणन , कृषी , फलोत्पादन , मदत व पुनर्वसन या सर्व विभागाचा आढावा घेऊन माहिती घेतली.यावेळी या बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे , मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील , फलोत्पादन मंत्री भरत गोगावले , कृषी आयुक्त सुरज मांढरे , मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दिपक पवार , प्रभाकर नारकर (जनता दल सेक्युलर), राजन राजे (धर्मराज्य पक्ष),शेकापचे राजेंद्र कोरडे , मनसे प्रवक्ते कुणाल माईनकर , माकपचे अरमाईटी इराणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3380659
Share This Article