मालवण: मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि उसळलेल्या समुद्राच्या लाटा अशा प्रतिकूल परिस्थितीत मालवणच्या दांडी किनाऱ्यावर एक अत्यंत दुर्मिळ “मास्क बुबी” (Masked Booby) समुद्री पक्षी आढळला. युथ बीट्स फॉर क्लायमेट संस्थेच्या सदस्यांसह स्थानिक निसर्गप्रेमींच्या सतर्कतेमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे या पक्ष्याला जीवदान मिळाले, ज्यामुळे निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात एक प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे.
शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास, पावसाने थोडी उसंत घेतल्यानंतर चंद्रकांत कुबल आणि त्यांचा मुलगा साहिल दांडी किनाऱ्यावर फेरफटका मारत होते. त्यावेळी साहिलला समुद्राच्या लाटेत एक मोठा पक्षी स्थिर उभा असलेला दिसला. “अरे, ह्यो हलना नाय कसो?” असे म्हणत ते त्या पक्षाजवळ गेले. पक्षी शांत होता आणि त्याच्याभोवती भटके कुत्रे फिरत होते. संभाव्य धोका लक्षात घेऊन साहिलने तात्काळ युथ बीट्स फॉर क्लायमेट संस्थेचा सदस्य असलेल्या अक्षयला फोन केला.
अक्षय तातडीने घटनास्थळी पोहोचला. त्याने पाहिले की, तो पक्षी गायबगळ्यापेक्षा मोठा होता. त्याचे डोके आणि त्याखालील भाग राखाडी रंगाचा होता, पोट पांढरे होते आणि पाय बदकासारखे होते. अक्षयने लगेच त्या पक्षाचे फोटो दर्शन आणि स्वप्नील यांना पाठवले. त्यांनी तो पक्षी “मास्क बुबी” असल्याची पुष्टी केली. हे पक्षी प्रामुख्याने प्रशांत महासागर परिसरात आढळतात आणि विणीच्या हंगामात समुद्रातील बेटांवरील खडकांवर अंडी घालतात. पिल्ले मोठी झाल्यावर महासागराकडे जातात.
अक्षयच्या लक्षात आले की, सापडलेला पक्षी हे एक पिल्लू होते आणि त्याला उडण्यासाठी पुरेसी शक्ती नव्हती. असेच राहिल्यास कुत्रे त्याला फाडून खाऊ शकतील, हे लक्षात घेऊन अक्षयने स्वातीला फोन करून पिंजरा तयार ठेवण्यास सांगितले. पक्ष्याला कसे पकडावे या विचारात साहिल आणि अक्षय असताना, साहिलने घरातून रिकामे पोते आणले. ते पोते पक्ष्यावर टाकून अक्षयने अलगद त्याला पकडले. त्यानंतर ते दोघे मोटरसायकलवरून स्वातीकडे आले आणि पक्ष्याला पिंजऱ्यात ठेवले.
पक्षी खूप दमलेला होता. त्याने तोंडात छोटे मासे घट्ट पकडून ठेवले होते. पक्ष्याचा फोटो काढून, पिंजऱ्यावर कापड घालून तो हवेशीर जागी ठेवण्यात आला. “रात्रभर आता काय घडते हे बघून उद्या काय तो निर्णय घेऊया,” असे अक्षय, साहिल आणि स्वातीने ठरवले. रात्री मनीषाने पक्ष्याला पाहिले असता, तो डोळे मिटून शांत झोपलेला होता.
रात्रभर आराम मिळाल्यानंतर सकाळी स्वातीने पाहिले असता, पक्षी ताजातवाना दिसत होता. आपल्या निळसर रंगाची झाक असलेल्या मोठ्या चोचीने तो अंग स्वच्छ करत होता, पांढरी आणि करडी पिसे विंचरत होता आणि पंखांची उघडझाप करत होता. त्याने समोर ठेवलेले खाऊ मात्र खाल्ले नव्हते. त्याच्या काळ्याभोर डोळ्यांनी तो परिसर न्याहाळत होता. त्याला उपचारापेक्षा फक्त आरामाची गरज असल्याचे सर्वांच्या लक्षात आले आणि तो आता उडू शकेल अशी खात्री पटली.
या पक्ष्याला कुठे सोडावे, यावर विचारमंथन झाले. दर्शनने सुचवले की, कांदळवन असलेली खाडी आणि जवळच समुद्र असलेली कोळंब पूलाजवळील जागा योग्य राहील. जर त्याला जास्त उडता आले नाही, तर तो कांदळवनाच्या फांदीवर बसेल आणि तिथे तो जास्त सुरक्षित राहील. ही सूचना सर्वांनाच आवडली.
अक्षय, साहिल, भार्गव, दर्शन आणि संजय स्वातीकडे आले. साहिल आणि अक्षयने पिंजरा आणला. दर्शनच्या मोटरसायकलला पिंजरा बांधून ते सर्व खापरेश्वर मंदिराच्या पुढे आले. योग्य जागा पाहून पिंजऱ्याचे दार उघडले. अक्षयने “बाबू बाहेर ये,” असा आवाज दिला. पक्षी क्षणभर थांबला, हलकेच उडून समोरच्या पाण्यात पोहू लागला. वेग पकडत त्याने आकाशाला गवसणी घातली आणि समुद्रावरून गिरट्या घालू लागला. समुद्री पक्षाला त्याचा समुद्र परत मिळाला आणि तो आनंदात होता. थोड्या अंतरावर जाऊन त्याने समुद्रात डुबकी मारून मासा पकडला. हे दृश्य पाहून सर्व सदस्य हात उंचावून त्याला शुभेच्छा देत होते.
या घटनेमुळे मालवणमधील निसर्गप्रेमींची आणि युथ बीट्स फॉर क्लायमेट संस्थेच्या सदस्यांची निसर्ग संवर्धनाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे एका दुर्मिळ प्रजातीच्या पक्ष्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणे शक्य झाले.