८२ गुण मिळूनही अंतिम यादीत स्थान नाही; निवड प्रक्रियेवरच ग्रामस्थांचा सवाल; मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सकारात्मक भूमिका
संगमेश्वर: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान स्पर्धेत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबेड बुद्रुकवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. या अन्यायाविरोधात संतप्त ग्रामस्थांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेतल्यानंतर हे निवेदन तातडीने राज्य शासनाकडे पाठवले जाईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, या प्रकरणात जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांनीही महत्त्वाची भूमिका घेतली असून जर संपूर्ण प्रक्रियेत कुठे चूक झाली असेल, तर या प्रकरणाचे पुनर्परीक्षण व्हायलाच हवे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेड बुद्रुक ग्रामपंचायतीने या स्पर्धेसाठी ऑनलाईन पद्धतीने सर्व आवश्यक माहिती अत्यंत अचूकपणे भरली होती आणि त्या आधारे ग्रामपंचायतीला तब्बल ८२ गुण मिळाले होते. एवढे उच्च गुण मिळूनही अंतिम निवड यादीत ग्रामपंचायतीला स्थान न मिळाल्यामुळे संपूर्ण गावात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतः दोन वेळा या ग्रामपंचायतीला भेट देऊन येथील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यामुळे या स्पर्धेत गावाला किमान दुसरा क्रमांक नक्कीच मिळेल, असा ठाम विश्वास ग्रामस्थांना होता. मात्र अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर ग्रामस्थांच्या विश्वासाला मोठा तडा गेला आहे.
या स्पर्धेच्या मूल्यमापनासाठी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रत्यक्ष पाहणी केली होती. मात्र या समितीने नेमक्या कोणत्या निकषांवर गुणांकन केले, इतर ग्रामपंचायतींना किती गुण दिले आणि मुख्य म्हणजे अंतिम अहवालात नेमके काय नमूद केले, याबाबातची कोणतीही अधिकृत माहिती ग्रामपंचायतीला देण्यात आलेली नाही, असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मूल्यांकन समितीचा अधिकृत अहवाल येण्यापूर्वीच, केवळ एका विस्तार अधिकाऱ्याला संपर्क करून जिल्हास्तरीय समितीने पुढील तपासणी उरकून घेतली. या तपासणीबाबत पंचायत समितीला कोणत्याही प्रकारचा लेखी दौरा कळवण्यात आला नव्हता. जिल्हास्तरीय समिती कोणत्या आधारे ही तपासणी करून गेली, याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात असून हे सारे गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या सर्व प्रकारामुळे संपूर्ण निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील एकूण २५ ग्रामपंचायतींपैकी आंबेड बुद्रुक, कडवई, माखजन, चोरवणे, आंबव पोक्षे आणि ओझरे खुर्द या सहा ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र जिल्हास्तरीय समितीने या सहापैकी केवळ चोरवणे आणि ओझरे खुर्द या दोनच ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष पाहणी केल्याची माहिती आता समोर आली आहे. यामुळे ग्रामस्थांचा संशय आणखी गडद झाला आहे. गुणवंत ग्रामपंचायतीला न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी मूल्यांकन समितीचा अधिकृत अहवाल, गुणदानाचे सर्व निकष आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व ग्रामपंचायतींचे गुण तातडीने जाहीर करावेत, अशी ठाम मागणी केली आहे. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून आता राज्य शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






