राजापूर: तालुक्यातील कोदवली मांडवकर खालचीवाडी येथे एका २७ वर्षीय तरुणाने कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून राजापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार चंद्रकांत मांडवकर (वय २७, रा. कोदवली मांडवकर खालचीवाडी, ता. राजापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. २६ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास ओंकार हा घरात असताना कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादाच्या रागातून आणि दारूच्या नशेत त्याने राहत्या घराच्या किचनच्या बाजूला असलेल्या पडवीत जाऊन लोखंडी बारला साडीच्या काठाने गळफास लावून घेतला.
हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावून ओंकारला उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासत पूर्वीच मृत घोषित केले. या घटने संदर्भात २७ मे २०२६ रोजी मध्यरात्री १:१४ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ३५/२०२६ नुसार नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.






