रायगड: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या निसर्गरम्य देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाटात पर्यटकांना प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ नुसार १७ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी हा प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.
माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावच्या हद्दीतील “देवकुंड धबधबा” व सणसवाडी गावच्या हद्दीतील “सिक्रेट पॉईंट” आणि “ताम्हिणी घाट” या परिसरात हा आदेश लागू राहणार असल्याची माहिती माणगाव (जि. रायगड) उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
पावसाळ्यात या तिन्ही ठिकाणांची पर्यटकांना मोठी भुरळ पडते, मात्र त्यांची सुरक्षितता लक्षात घेता प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. “सिक्रेट पॉईंट” या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तर “ताम्हिणी घाट” हा धोकादायक वळणांचा व तीव्र उताराचा असल्याने तसेच दरड कोसळण्याचा संभव असल्याने पर्यटकांची वित्त व जीवित हानी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या गंभीर कारणांमुळे “देवकुंड धबधबा”, “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हिणी घाट” तसेच त्यांच्या आजूबाजूच्या १ किलोमीटर परिसरातही प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.
या मनाई आदेशानुसार, केवळ प्रवेशबंदीच नव्हे तर इतरही काही कृतींवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्या जागेवर मद्यसेवन करणे यावर पूर्णपणे बंदी आहे. असे बेकायदेशीर वर्तन आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, पावसामुळे धोकादायक झालेल्या ठिकाणी, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे, रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, रिल्स व्हिडीओ बनविणे यालाही मनाई आहे.
पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या धोकादायक पाण्यात / खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्याच्या वरील बाजूला जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली बसणे, धोकादायक स्थिती निर्माण होईल अगर जीवितहानी होईल असे धबधबे किंवा तलाव याठिकाणी पाण्यात उतरणे यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे. रहदारीच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे, वाहने अतिवेगाने चालविणे, वाहनाची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे या कृतींनाही प्रशासनाने बंदी घातली आहे.
सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या, थर्माकोलचे व प्लॅस्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डी.जे. सिस्टिम वाजवणे, गाडीमधील स्पिकर/ वूफर वाजवणे व त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे, तसेच ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे या सर्व बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. धरण/तलाव/धबधब्याच्या १ किलोमीटर परिसरात दुचाकी/तीन चाकी/चार चाकी / सहा चाकी वाहनांनी प्रवेश करणे (अत्यावश्यक सेवा वगळून) यावरही बंदी आहे. नागरिकांनी या आदेशाची गांभीर्याने नोंद घ्यावी असे आवाहन माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांनी केले आहे.