हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
रत्नागिरी : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ आज रत्नागिरी शहरात हजारो विद्यार्थी, नागरिक, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना आणि नोकरदार वर्ग रस्त्यावर उतरला. “शिक्षण वाचवा, लोकशाही वाचवा”, “हुकूमशाही सरकारचा निषेध असो”, “विद्यार्थ्यांवरील दडपशाही बंद करा”, “सरकार होश में आओ”, धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाने घोषणा करण्यात करण्यात आल्या. गगनभेदी घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आणि सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर रात्रीच्या अंधारात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार मंचाच्या पुढाकाराने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या धोरणांविरोधात आणि २३ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
सकाळी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थी, युवक, नागरिक आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
आंदोलनकर्त्यांनी सरकारवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणे ही हुकूमशाहीची प्रवृत्ती असल्याची टीका केली. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मोर्चात सर्व विद्यार्थी संघटना, विविध सामाजिक संघटना, नोकरदार वर्ग तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पक्षभेद आणि मतभेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले.
दिल्लीतील विद्यार्थांच्या समर्थनार्थ रत्नागिरीत विराट मोर्चा
Leave a Comment





