रत्नागिरी: नरबे फाटा परिसरात मंगळवारी (दि. १५ जुलै) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत टेम्पोमधील तिघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जखमींमध्ये फिरदोस न्यायत खले (४०), अमजत आलेमिया जांभारकर (५०) आणि मुज्जफिर अमजत जांभारकर (रा. पडवे, ता. गुहागर) यांचा समावेश आहे. या प्रकरणी फिरदोस खले यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, फिरदोस खले आणि त्यांचे दोन सहकारी मिरकरवाडा जेटी येथे मासळी घेऊन जात होते. त्यासाठी त्यांनी पहाटे ४.३० च्या सुमारास जाकादेवीहून टेम्पो (क्र. एमएच-०८-डब्ल्यू-४७०३) मार्फत प्रवास सुरू केला होता. मात्र, सकाळी साडेसहा वाजता तरवळ घवाळीवाडी स्टॉपजवळ नर्भे फाट्याच्या अलीकडे निवळी बाजूकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. एमएच-०९-जीजे-४३४७) त्यांच्या टेम्पोला समोरासमोर धडक दिली.
अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून ट्रकचालकाविरोधात बेदरकारपणे वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.