GRAMIN SEARCH BANNER

अतिवृष्टीमुळे जानवळे ग्रामपंचायत इमारत धोकादायक, कामकाजाचे स्थलांतर

Gramin Varta
34 Views

गुहागर: तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतीची इमारत अतिवृष्टीमुळे धोकादायक बनली असून, इमारतीच्या भिंतींना मोठे तडे गेले आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज तात्काळ दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल गुहागरचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे, अशी माहिती सरपंच जान्हवी विखारे यांनी दिली आहे.

गेली अनेक वर्षे या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी होत आहे, परंतु अद्यापही निधी मंजूर झालेला नाही. अतिवृष्टीमुळे इमारतीची स्थिती आणखीच बिकट झाली असून, लाकडी वासे आणि भाले खराब झाले आहेत. यामुळे कोणत्याही क्षणी इमारत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वीच मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी स्वातंत्र्यदिनी गुहागर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. मात्र, तालुका प्रशासनाने केलेल्या विनंतीमुळे हे उपोषण स्थगित करण्यात आले होते.

ग्रामस्थांनी वारंवार पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे मागणी करूनही या इमारतीसाठी निधी मिळालेला नाही. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत नवीन इमारत बांधण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे, पण त्यावरही अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

या धोकादायक स्थितीमुळे ग्रामस्थांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. सद्यस्थितीत, ग्रामपंचायतीचे कामकाज गावातच असलेल्या एका बंद घरातून चालवण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, नवीन इमारतीच्या बांधणीची प्रतीक्षा कायम आहे. प्रशासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

Total Visitor Counter

3366979
Share This Article