खेड: तालुक्यातील सवणस-रांगळेवाडी येथील रहिवासी आणि सध्या मुंबईतील घाटकोपर येथे वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय तरुणीचा खाद्यपदार्थ खाल्ल्याने झालेल्या विषबाधेमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता १२वीपर्यंत शिक्षण घेतलेली तरुणी काही दिवसांपूर्वीच नोकरीच्या निमित्ताने घाटकोपर-मुंबई येथे आली होती. १३ जुलै रोजी तिने खाद्यपदार्थांचे सेवन केले. त्यानंतर तिला सलग दोन दिवस उलट्यांचा त्रास आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला. प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान मंगळवारी रात्री तिचा मृत्यू झाला.
निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास सवणस येथील नजीकच्या स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.