चिपळूण: स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये चिपळूण नगरपालिकेने राज्यात यश मिळविल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मुख्याधिकारी विशाल भोसले यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
त्यांना समस्यांचे निवेदनही देण्यात आले.
विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व उपशहरप्रमुख सचिन ऊर्फ भैय्या कदम यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जुन्या वाशिष्ठी पुलाखाली विसर्जनासाठी वापरला जाणारा घाट पुलाच्या तोडफोडीमुळे बंद झाला असून मार्कंडी, मतेवाडी, गांधीनगर, रावतळे, परशुरामनगर आदी भागांतील सुमारे १२०० घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे विसर्जनासाठी तत्काळ पर्यायी घाटाची व्यवस्था करण्यात यावी.
चिंचनाका, खाटीक आळी, गोवळकोट रोड, रॉयल नगर, प्रभात रोड आदी परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून नुकतेच भरले गेलेले खड्डे चार दिवसांतच उघडले गेले आहेत. अपुऱ्या डागडुजीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून या रस्त्यांचे टिकाऊ डांबरीकरण करण्याची गरज निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
यावर्षी डास प्रतिबंधक फवारणी अजिबात न झाल्याने डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढला आहे. फवारणी तातडीने करण्यात यावी. शहरातील अंतर्गत पाखाड्यांवर व पायवाटांवर साचलेल्या शेवाळामुळे अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा ठिकाणी ब्लीचिंग पावडर टाकावी. भटक्या कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा त्रास वाढत असून नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व मोकाट जनावरांच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली.
मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी या सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या असून संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
चिपळूण: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
