रमेश शिंदे / भडकंबा : रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील रस्त्याला तडे जाऊन काही ठिकाणी रस्ता खचल्याच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूरहून आंबा घाटमार्गे येणारी एसटी वाहतूक बंद करण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी कोल्हापूर एसटी विभागाला दिले आहे. असे असले तरी रत्नागिरीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी बसची वाहतूक सुरूच असल्याची अधिकृत माहिती रत्नागिरी एसटी विभागाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे एसटी वाहतुकीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.
आंबा घाटातील रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर एसटी विभागाकडून आंबा घाटमार्गे एसटी बस वाहतूक बंद करून अनुस्कुरा घाट मार्गे सुरू करण्यात आली आहे. बसचा समावेश अवजड वाहतुकीत होत असल्याने कोल्हापूरहून आंबा घाटमार्गे येणाऱ्या बस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे या पत्रातून स्पष्ट होत असल्याचे समजते.
कोल्हापूरहून आंबा घाटमार्गे येणाऱ्या एसटी बससाठी पर्यायी मार्ग म्हणून अनुस्कुरा मार्गाचा वापर करण्यात येत असल्याचे समजते. त्यामुळे कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना आता अधिक लांबचा पर्यायी मार्ग स्वीकारावा लागू शकतो.
दरम्यान, रत्नागिरी एसटी विभागाकडून मात्र रत्नागिरीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी बसची वाहतूक सुरू असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आंबा घाटमार्गे दोन्ही बाजूंची एसटी वाहतूक बंद असल्याची चर्चा चुकीची ठरत आहे.
आंबा घाटातील रस्त्याला पडलेले तडे आणि खचलेल्या भागामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, वाहतुकीबाबत प्रशासनाकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे. घाटातील रस्त्याची तातडीने पाहणी करून सुरक्षित वाहतुकीबाबत स्पष्ट सूचना देण्याची मागणीही होत आहे.
रत्नागिरीहून कोल्हापूर मार्गे एसटी बस सुरूच
Leave a Comment





