नवी दिल्ली: युनेस्कोने मराठ्यांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या किल्ल्यांपैकी प्रत्येक किल्ल्याशी इतिहासाचे एक पान जोडलेले आहे आणि येथील प्रत्येक दगड ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे.
शत्रूंनी त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अशक्य ते शक्य करून दाखवले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गौरवोद्गार काढले. ‘मन की बात’च्या १२४ व्या भागातून मोदींनी देशवासियांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, गेल्या काही आठवड्यामध्ये क्रीडा क्षेत्र असो, विज्ञान असो अथवा संस्कृतीचे क्षेत्र असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी अनेकांनी केली आहे. अलिकडेच शुभांशू शुक्ला हे अवकाशातून परतले, याविषयी संपूर्ण देशामध्ये खूप चर्चा झाली. शुभांशू सुरक्षित भूमीवर परतताच लोकांच्या हृदयामध्ये जणू एक आनंदाची लाट उसळली. संपूर्ण देशाला शुभांशू यांच्या कामगिरीविषयी अभिमान वाटला. अशावेळी मला एका घटनेचं स्मरण होत आहे. ज्यावेळी ऑगस्ट 2023 मध्ये चंद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले, त्यावेळीही देशामध्ये अशाच प्रकारचे अनोखे वातावरण तयार झाले होते. विज्ञानापासून ते अंतराळापर्यंतच्या विषयांमध्ये अगदी लहान-लहान मुलांमध्येही एक नवीन जिज्ञासा, उत्सुकता जागृत झाली होती. आता लहान-लहान मुलेही म्हणताहेत की, आम्हीही अंतराळामध्ये जाणार! आम्हीही चंद्रावर जाणार, अंतराळ संशोधक बनणार!
ऑगस्टचा महिना क्रांतीचा महिना आहे. 1 ऑगस्टला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी असते, याच महिन्यात 8 ऑगस्टला गांधींजीच्या नेतृत्वाखाली ‘भारत छोडो आंदोलना’चा प्रारंभ झाला होता. त्यानंतर 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिवस येतो, त्यावेळी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या समर्पणाचं स्मरण करतो, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतो, परंतु मित्रांनो, आपल्या स्वातंत्र्याबरोबरच देशाचं विभाजन झालं, त्याचा सलही मनात कायम आहे. म्हणूनच आपण 14 ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिवस’ या स्वरूपामध्ये पाळतो.
वस्त्रोद्याग हे भारताचे फक्त एक क्षेत्र आहे असं नाही. हे आपल्या सांस्कृतिक वैविध्याचं उदाहरण आहे. आज वस्त्रोद्याग आणि तयार कपड्यांची बाजारपेठ खूप तेजीत आहे, आणि ही बाजारपेठ सातत्यानं वाढत आहे. या विकास मार्गातील सर्वात सुंदर गोष्ट अशी आहे की, गावांतील महिला, शहरांतील डिझाईनर, वयानं ज्येष्ठ असलेले विणकर आणि स्टार्ट-अप सुरू करणारे आमचे युवक, असे सर्वजण मिळून या प्रवासात पुढची वाटचाल करीत आहेत. आज भारतामध्ये 3000 पेक्षा जास्त वस्त्रोद्योग स्टार्ट-अप सक्रिय आहेत. अनेक स्टार्ट -अप्सनी भारताच्या हातमागाला नवी ओळख देवून वैश्विक उंची प्राप्त करून दिली आहे. मित्रांनो, 2047 च्या विकसित भारताचा मार्ग आत्मनिर्भरतेतून, स्वावलंबनातून निर्माण होणार आहे. आणि आत्मनिर्भर भारताचा सर्वात मोठा आधार आहे- ‘व्होकल फॉर लोकल’! ज्या गोष्टी भारतामध्ये बनल्या आहेत, ज्या वस्तू बनविण्यासाठी भारतीयानं घाम गाळला आहे, त्याच वस्तू खरेदी कराव्यात आणि अशाच स्वदेशी वस्तूंची विक्री केली जावी, असा आपण संकल्प केला पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अशक्य ते शक्य करून दाखवले – पंतप्रधान
