रत्नागिरी: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील १२ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या उल्लेखनीय आणि निष्कलंक दीर्घकालीनसेवेची दखल घेत त्यांना मानाची पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार आणि महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाच्या मार्फत ही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल पोलीस दलातील कर्तबगार कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे.
यावर्षीच्या‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ २०२६ साठी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन दत्तात्रय ढेरे, पोलीस मुख्यालयी कार्यरत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ महादेव गुरव, लांजा पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय शिवाजी साळवी, जिल्हा विशेष शाखेच्या महिला पोलीस हवालदार निशा दीपक केळकर, पोलीस मुख्यालयातील महिला पोलीस हवालदार वैदेही विनोद कदम, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार महेश दिडू धुरव आणि लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आशीष वसंत शेलार यांची निवड झाली आहे.
तसेच ‘उत्कृष्ट सेवा पदक’ २०२६ साठी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित आनंदराव यादव, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद भिवानराव मेंगडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार विजय तानाजी आंबेकर आणि जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार अमोल अरुण कमरे यांना जाहीर झाले आहे.
दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष पदक प्रदान सोहळ्यात या सर्व अधिकारी व अंमलदारांना सन्मानित केले जाणार आहे. पोलीस दलातील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सर्व पदकप्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






