कोल्हापूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून येत्या 18 ऑगस्टपासून खंडपीठाचं काम सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडून 1 ऑगस्ट रोजी याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
यामुळे कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांच्या 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळालं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनीही त्याची माहिती सर्वप्रथम माजी खासदार संभाजीराजेंना दिल्याचंही समोर आलं.
कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही मागणी अनेक वर्षांपासून मागणी होती. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार होता. परंतु याचा निर्णय होत नव्हता. त्यासाठी अनेक आंदोलनं करण्यात आली. आता या लढ्याला मोठं यश मिळालं आहे.
न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी कोल्हापुरातील खंडपीठ महत्त्वाचं आहे. त्यामुळे सहा जिल्ह्यांतील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. वेळेसोबत पैशाचीही बचत त्यामुळे होणार आहे. कोल्हापुरातील खंडपीठाचे नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर त्याचे सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे.
अखेर कोल्हापूर खंडपीठाला मान्यता ; 18 ऑगस्टपासून खंडपीठाचं काम सुरू
