GRAMIN SEARCH BANNER

घेरा यशवंतगडाच्या दुरुस्तीच्या नावाखाली ढिसाळ कारभार; भिंत अद्याप कोसळलेलीच, ग्रामस्थ संतप्त

Gramin Search
25 Views

राजापूर: राजन लाड/राजापूर तालुक्यातील इतिहास साक्षीदार ‘घेरा यशवंतगड’ किल्ल्याच्या दुरुस्ती दरम्यान नुकतीच एक संरक्षक भिंत अचानक कोसळली आहे. कोसळलेली भिंत ही दगडी रचना असून, अनेक दशके तग धरून उभी होती. या दुर्घटनेमुळे सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता, पारदर्शकता आणि नियोजनावर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्रामस्थांच्या मते, या कामाच्या सुरुवातीला स्थानिक ग्रामस्थ, इतिहास अभ्यासक किंवा लगतच्या नाटे, साखरी नाटे या दोन्ही ग्रामपंचायतीना विश्वासात घेतलेले नव्हते. “हा लोकांच्या वारशावर लोकांशिवाय सुरू झालेला प्रकल्प आहे का?” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. एका गडप्रेमी आणि ग्रामस्थाने तर, “इथं पायवाट सुधरताना, पाखाडी बांधताना बॅनर लागतो, पण गड दुरुस्तीत एकही सूचना नाही, बॅनर नाही, लोकप्रतिनिधींना निमंत्रण नाही! हे ऐतिहासिक दुर्लक्ष नाही का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

दुरुस्तीच्या कामावेळी गडाची एक महत्त्वाची भिंत कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र या घटनेने कामाची दर्जा आणि पद्धत किती हलगर्जीपणाची आहे, हे अधोरेखित केले आहे. स्थानिकांच्या आरोपानुसार जुन्या दगडांची ऐवजी नवे, मशीनी कटिंग केलेले निकृष्ट दर्जाचे जांभा दगड वापरले गेले आहेत. कोणताही प्राचीन स्थापत्यशास्त्राचा सल्ला न घेता काम सुरू झाले असावे, असा ग्रामस्थांचा दावा आहे. तसेच, कोणतीही तांत्रिक फलक, सूचना किंवा पर्यटकांसाठी सावधानतेचे बॅनरही लावलेले नाहीत.
खास उल्लेखनीय म्हणजे, अगदी छोट्या कामांसाठीही मोठमोठे बॅनर लावणारे प्रशासन या कामाची सुरुवात करताना कोणतेही अधिकृत उद्घाटन, माहिती फलक किंवा एकही स्थानिक प्रतिनिधींची उपस्थिती ठेवायला का विसरले, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. “दोन कुंडी खोदल्यावर उद्घाटनासाठी अनेक पुढाऱ्यांना बोलावलं जातं, बॅनर लावले जातात, मग इतक्या मोठ्या ऐतिहासिक कामाचं भूमिपूजन गुपचूप झालं का?” असा प्रश्न विचारला जात आहे.

दुरुस्ती वेळी ढासळलेल्या भिंतीच्या घटनेनंतर अनेक शिवप्रेमी, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केल्यानंतर पुढील गोष्टींची मागणी होत आहे. यात कामाची तांत्रिक व आर्थिक सखोल चौकशी व्हावी, पुरातत्त्व विभागाचा थेट सहभाग असावा, स्थानीय लोकप्रतिनिधी, अभ्यासक, ग्रामस्थ यांचा सहभाग असलेली सल्लागार समिती तयार करावी, गड परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्पष्ट फलक, सूचना, प्रवेशबंदीच्या सूचना त्वरित लावाव्यात आणि ज्या ठेकेदाराने काम केले, त्याला जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांचा समावेश आहे.
‘संवर्धन’ आणि ‘विकास’ यामध्ये सूक्ष्म रेषा असते. घेरा यशवंतगड हे केवळ ऐतिहासिक वास्तू नाही, तर गावकऱ्यांचा, शिवप्रेमींचा आत्माभिमान आणि कोकणाच्या वारशाचं प्रतीक आहे. या गडाचे काम उत्तम दर्जाचं ऐतिहासिक खानाखुणा जतन करून करावं लागेल, अशी भावना व्यक्त होत आहे. लोकांचा विश्वास गमावून कोणतंही जतन टिकत नाही, असे मतही ग्रामस्थ मांडत आहेत.

Total Visitor Counter

3366874
Share This Article