पाली : मुंबई गोवा महामार्गावर पालीनजीक खानूगावच्या हद्दीत झालेल्या दुचाकी कार अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू झाला. तसेच यामध्ये दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती ती तात्काळ महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र व पाली पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळपणे घटनास्थळी जात सुरळीत केली.
या अपघाताबाबत पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गावर खानू गावच्या हद्दीत मठहून खानूच्या दिशेने येणारी दुचाकी क्रमांक एमएच ०८ डीएल ७९९६ घेऊन आशिष किशन धाडवे वय३२ रा.कडूगाव मठ,ता.लांजा हा दुचाकी घेऊन येथील पेट्रोल पंपात पेट्रोल भरण्यासाठी येण्यासाठी रस्ता ओलांडत असताना पाली होऊन लांजा कडे जाणारी व्हॅगनार क्रमांक एमएच ०५ इव्ही६४३५ या गाडीची ठोकर होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन मयत झाला आहे. हा अपघात सायंकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान घडला त्यामुळे महामार्गावरील एका बाजूवर वाहतूक कोंडी झाली होती.
या अपघातातील मयत आशिष धाडवे याचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते तसेच तो काही महिन्यांपूर्वीच नोकरीच्या शोधा निमित्त गावी मठ येथे आला होता व काही दिवसांपूर्वीच त्याने पाली येथे नोकरी मिळवली होती. त्यामुळे त्याचा संसार सावरत असतानाच ऐन गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशीच झालेल्या याअपघाती मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबाचाच डोलारा कोसळला आहे. या अपघाती मृत्यूमुळे आशिषच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.त्याच्या पश्चात पत्नी, आई,वडील,दोन भाऊ असा परिवार आहे.
या अपघाताची खबर संतोष लक्ष्मण धाडवे रा.कडूगाव मठ यांनी दिल्यावरून या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूर क्षेत्रात करण्यात आली असून अधिक तपास पाली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रोशन सुर्वे हे करीत आहेत.







