रत्नागिरी: समाजात आज सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यांचे प्रकारही वेगवेगळे आहेत; मात्र सायबर गुन्हे आपल्या चुकीमुळेच घडतात. आपण दक्ष राहिलो आणि न घाबरता परिस्थितीला तोंड दिले, तर हे गुन्हे घडणार नाहीत.
म्हणूनच आजच्या युगात सायबर संस्कार या १७व्या संस्काराची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. अक्षय फाटक यांनी केले.
रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात नगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘सायबर संस्कार’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत, रत्नागिरी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी मयूर बेहेरे उपस्थित होते. कार्यक्रमाला विविध वयोगटांतील रत्नागिरीकर उपस्थित होते.
मोबाइलद्वारे फसवणुकीचे अनेक गुन्हे घडतात. कधी ओटीपी मागून, तर कधी बिल न भरल्यामुळे वीज तोडण्याची भीती घालून फसवले जाते. हे जाळे ओळखायचे कसे, त्यात अडकू नये म्हणून आणि अडकायला झाले तर काय करायचे याबद्दलचे मार्गदर्शन डॉक्टर अक्षय फाटक यांनी या अनोख्या कार्यक्रमातून रत्नागिरीकरांना केले. सायबर फसवणुकीची उदाहरणे सांगतानाच, मोबाइलची आवश्यक सेटिंग्ज आणि डिजिटल व्यासपीठावर माहितीची गोपनीयता जपण्याबद्दलही त्यांनी सांगितले. मुलांना मोबाइल द्यायचा झाल्यास काय काळजी घ्यावी, याबद्दल सांगतानाच चांगली व्यक्ती घडण्यासाठी ‘सायबर संस्कार’ हा १७वा संस्कारही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या नावावर असलेले मोबाइल क्रमांक जाणून घेण्यासाठी संचारसाथी या वेबसाइटबद्दल त्यांनी सांगितले. तसेच सायबर गुन्हा घडल्यास तातडीने रिपोर्ट करण्यासाठी १९३० या टोल फ्री क्रमांकाची माहितीही त्यांनी दिली. मोबाइल अनलॉक करण्यासाठी फिंगरप्रिंटचा वापर करणे आणि मोबाइलचे लोकेशन कायम ऑन ठेवणे कसे धोक्याचे आहे, याबद्दलही त्यांनी सांगितले.
समाजमाध्यमांवर वेळोवेळी स्टेटस अपडेट करण्यातून गुन्हे कसे घडू शकतात, हेही डॉ. फाटक यांनी उलगडून सांगितले. आपण दक्ष राहिलो, सारासार विचार करण्याची बुद्धी न हरवता शांतपणे अशा प्रकाराला सामोरे गेलो, तर असे गुन्हे घडणारच नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. तरीही काही घडलेच, तर मदतीसाठी आपण कायम उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. आपला मोबाइल क्रमांक, यूट्यूब चॅनेल, इन्स्टाग्राम चॅनेल याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, उपस्थितांच्या निवडक प्रश्नांची उत्तरेही दिली.
सध्या रत्नागिरीत वास्तव्याला असलेले डॉ. अक्षय फाटक हे मूळचे कसबा-संगमेश्वर येथील तरुण इंजिनीअर असून, ज्योतिर्विद्यावाचस्पती आहेत. आपल्या मैत्रिणीला अशाच एका प्रकारातून जीव गमवावा लागल्यानंतर त्यांनी समाजावर सायबर संस्कार करण्याचा वसा घेतला आहे. मोबाइल किंवा समाजमाध्यमांवरची खाती हॅक झाल्यास किंवा सायबर फसवणूक घडल्यास त्यातून तातडीने मार्ग काढण्यासाठी डॉ. अक्षय मदत करतात आणि तीही कोणतेही मानधन न घेता. तरीही कोणी मानधन देऊ केल्यास ती रक्कम थेट दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या आशादीप आणि आविष्कार या संस्थांना द्यावी, असे ते सांगतात. यातून आतापर्यंत त्या संस्थांना दीड लाख रुपयांहून अधिक देणगी मिळाली आहे. यातून त्यांच्या कार्याची व्याप्ती कळते. डॉ. फाटक यांनी आतापर्यंत शाळा-महाविद्यालयांसह अनेक ठिकाणी हा कार्यक्रम छोट्या स्वरूपात केला आहे. रविवारी झालेला कार्यक्रम ८५वा होता आणि तो प्रथमच व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात आला होता.
पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सावरकर नाट्यगृह मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल पालिकेचे कौतुक करतानाच पालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली.
सायबर संस्कार या सतराव्या संस्काराची आता गरज : डॉ. अक्षय फाटक
