रत्नागिरी : मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा येथे सोमवारी सकाळी ट्रकच्या धडकेत रिक्षा उलटून तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
रिक्षा (एमएच ०८ बीसी १२१९) रत्नागिरीकडे येत असताना मागून आलेल्या ट्रकने (एमएच ०८ एपी ०७११) जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा रस्त्यावर उलटली. अपघातात चंद्रकांत रामचंद्र कांबळे (५०), मानसी चंद्रकांत कांबळे (४६) आणि नीतेश गंगाराम कांबळे (४०, तिघेही रा. हसोळ, बौद्धवाडी, ता. लांजा) हे जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच तेथे उपस्थित असलेल्या आरटीओ विभागातील पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने सर्व जखमींना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हातखंबा येथे ट्रकची रिक्षाला धडक, रिक्षा उलटून तीन प्रवासी जखमी







