आरवली : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडांमध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील चिखल माती आल्यामुळे पार दुर्दशा झाली आहे. मागील काही दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे सोमवारी आरवली परिसरात पुराचे पाणी भरले होते. पुराच्या पाण्याबरोबर कुंडांच्या दोन्ही बाजूने गेलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मार्गीकांमधील चिखल-माती आली आहे.
गडनदीच्या किनारी असलेली गरम पाण्याची कुंडे ही सखल भागात असल्यामुळे बाजूने गेलेल्या गड नदीला पूर आल्यानंतर पुराचे पाणी कुंड परिसरात भरते. मात्र पूर ओसरल्यानंतर काही कालावधी गेल्यानंतर कुंडामधील पाणी पुन्हा पूर्वीप्रमाणे होत असे. मात्र यावेळी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने निसर्गाची देणगी लाभलेल्या या कुंडांचा विचार न करताच महामार्गाचे काम केल्यामुळे याचा फटका आरवली येथील या गरम पाण्याच्या कुंडांना बसला आहे. सोमवारी आलेल्या पुरामुळे कुंडांच्या बाजूने गेलेल्या महामार्गाच्या कामामधील चिखल माती कुंडांमध्ये आली आहे. यामुळे या वर्षीच्या पावसाळ्यात कधी नव्हे इतकी कुंडांची दुर्दशा झाली आहे.
महामार्ग चौपदरीकरणातील चिखल-मातीने आरवलीतील गरम पाण्याच्या कुंडांची दुर्दशा

Leave a Comment
Leave a Comment