पाचल/ तुषार पाचलकर: रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे ठिकाण म्हणून पाचल बाजारपेठेची ओळख आहे. या बाजारपेठेत दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी ये-जा करत असतात. येथे सुसज्ज बस स्थानक, विविध बँका, शाळा-महाविद्यालये, वसतिगृह, दवाखाने आणि बाजारपेठेच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. पाचलची ही भौगोलिक आणि सोयीस्कर स्थिती लक्षात घेता, येथे शासकीय कार्यालय सुरू झाल्यास सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे राजकीय श्रेयवादाच्या पलीकडे जाऊन प्रशासनाने लोकहिताचा विचार करावा आणि पाचलमध्ये शासकीय कार्यालय सुरू करण्याबाबत सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी राजापूर तालुका बौद्धजन संघाचे माजी अध्यक्ष संजय जाधव यांनी केली आहे.
पाचल हे परिसरातील सर्व सोयींनी गजबजलेले ठिकाण असल्याने, येथे शासकीय कामकाज सुरू करणे नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
