रत्नागिरी : रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ला परिसरात भगवती मंदिराजवळ देशी वृक्षांच्या ‘बीजगोळ्यांचा प्रसार व बीज लागवड’ हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. स्थानिक जैवविविधतेचे रक्षण करणे, देशी वृक्षांचे संवर्धन करणे आणि रत्नदुर्ग किल्ला परिसर अधिक हरित व निसर्गसंपन्न बनवणे या मुख्य उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेत वनस्पतीशास्त्र विषयाच्या द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी फणस, मोह, चिंच, रिठा आणि आंबा अशा स्थानिक व उपयुक्त देशी वृक्षांच्या बियांचे बीजगोळे तयार केले. किल्ला परिसरातील मोकळ्या व योग्य जागेत या बीजगोळ्यांचा प्रसार करण्यात आला, तसेच काही ठिकाणी थेट बियांची लागवडही करण्यात आली. ‘बीज पसरवा, निसर्ग फुलवा!’ या गगनभेदी घोषणेने विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमवून सोडत पर्यावरण रक्षणाचा प्रभावी संदेश दिला. प्रत्यक्ष कृतीतून देशी वृक्षांचे महत्त्व आणि निसर्ग संवर्धनाची गरज समजून घेण्याची उत्तम संधी विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळाली.
हा उपक्रम वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता, तर कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन श्री. गुरव सर यांनी केले. भगवती मंदिर परिसरात पार पडलेल्या या लागवडीत प्रा. शरद आपटे, डॉ. विराज चाबके आणि श्रीम. प्रियांका शिंदे-अवेरे यांनी स्वतः सक्रिय सहभाग नोंदवत बीज लागवड केली. नैसर्गिक पुनरुत्पादनाला गती देण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती सामाजिक बांधिलकी रुजवणारा हा उपक्रम अत्यंत फलदायी ठरला असून, आज पेरलेली ही बीजे उद्याची समृद्ध वनसंपदा घडवतील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.




