चिपळूण : चिपळूणमधील वालोपे रेल्वेस्थानकावर सुरू करण्यात आलेल्या ‘पे अँड पार्क’ सुविधेमुळे वाहनचोरीसह इंधन चोरीचे प्रकार पूर्णपणे थांबले असून, गेल्या सहा महिन्यांपासून एकही दुचाकी चोरीला गेलेली नाही. ही व्यवस्था प्रवाशांसाठी दिलासादायक ठरत आहे.
दररोज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि खेड तालुक्यातील प्रवासी चिपळूण रेल्वेस्थानकावरून प्रवास करत असतात. यातील बऱ्याच प्रवाशांना कामानिमित्त मुंबईसारख्या ठिकाणी जावे लागते, जे रात्री उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी परत येतात. यापूर्वी रेल्वेस्थानक परिसरात वाहने कुठेही उभी केली जात होती. त्यामुळे वाहनांमधील पेट्रोल चोरी जाणे, तसेच दुचाकी चोरी होणे हे प्रकार वारंवार घडत होते.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने सहा महिन्यांपूर्वी रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण केले. रिक्षा स्थानक व वाहनांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली. दोन्ही बाजूंनी लोखंडी व पत्र्याचे शेड उभारण्यात आले. कोकण रेल्वेने देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी ‘पे अँड पार्क’ सुविधा सुरू केली असून, खासगी एजन्सीकडे त्याचा ठेका दिला आहे. एजन्सीचे कर्मचारी २४ तास सेवेत असून, वाहन पार्किंगनंतर टोकन देण्यात येते. परतताना हेच टोकन सादर करून ठराविक शुल्क दिले जाते. दुचाकीसाठी २४ तासांचे शुल्क २० रुपये, तर चारचाकीसाठी ४० रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.
या सुविधेमुळे रेल्वेस्थानक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण शून्यावर आले असून, सुरक्षा व्यवस्थेला मजबुती मिळाली आहे. याबाबत माहिती देताना रेल्वे पोलिस निरीक्षक राहुल हडके म्हणाले, “पे अँड पार्क सुरू झाल्यानंतर चोरीचे प्रकार पूर्णपणे थांबले आहेत. कोणीही जास्त पैसे घेत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तक्रार करावी, आम्ही कठोर कारवाई करू.”
चिपळूण रेल्वेस्थानकावर सुरू करण्यात आलेली ही सुविधा अन्य ठिकाणीही लागू करण्यासारखी ठरत असून, वाहनधारकांसाठी ती मोठा दिलासा देणारी ठरली आहे.
चिपळूण रेल्वेस्थानकावर ‘पे अँड पार्क’मुळे दुचाकी चोऱ्यांना ब्रेक!
