रत्नागिरी : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात जिल्ह्यातील सुमारे ५०० कर्मचारी सहभागी झाले होते. अनेक वेळा पाठपुरावा करूनही राज्य शासनाकडून आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्या मांडल्या. यामध्ये ग्रामपंचायतींच्या उत्पन्न व वसुलीच्या अटी रद्द करणे, लोकसंख्येनुसार ठरवलेल्या आकृतीबंधामध्ये सुधारणा करणे, १०० टक्के महागाई भत्ता शासनाकडून देणे, ग्रॅज्युइटीसाठीच्या जाचक अटी रद्द करणे, आणि अभय यावतकर समितीच्या शिफारशी लागू करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
हा केवळ आंदोलनाचा पहिला टप्पा असून, यानंतरही शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. १८ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर राज्यभरातील कर्मचारी मोर्चा काढणार आहेत. यानंतरही सरकार लक्ष देणार नसेल, तर ८ सप्टेंबर, २०२५ पासून साताऱ्यामध्ये बेमुदत संप पुकारण्याचा ठरावही या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र बाचीम, सचिव संजय खताते, सहसचिव सुदेश हडकर, संदीप हरयाणा, राजेश घाणेकर, अनंत पद्याल, आणि वैभव सुपल यांनी केले.
रत्नागिरी: प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेसमोर भव्य मोर्चा






