कत्तलीसाठी गुरांना नेताना पोलिसांनी पाठलाग करताच संशयितांचे वाहन झाडाला धडकले; दोघांना घेतले ताब्यात

Gramin Varta
404 Views

रत्नागिरी : रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फणसवळे गावातील जंगलमय भागात गोवंशाची वाहतूक केल्याच्या संशयावरून पोलिसांनी पाठलाग केलेल्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना २० ऑगस्ट रोजी घडली. पोलिसांच्या कारवाईदरम्यान संशयित वाहन चालकाने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र वाहन जंगलातील मार्गावर झाडाला धडकल्याने त्याचा पाठलाग थांबला. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलिस नाईक शेखावत सेवक व इतर पोलिस कर्मचारी फणसवळे गावाच्या परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी फणसवळे गावाच्या परिसरात एक चारचाकी वाहन उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. वाहनाची खात्री करण्यासाठी पोलिसांनी वाहनाजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता वाहनातील इसमाने वाहन सुरू करून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला. पोलिस कर्मचारी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करत असतानाही वाहन चालकाने वाहन पुढे नेले. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा वाहनाचा पाठलाग केला असता संशयिताने वाहन जंगलमय भागातील बाजूच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अंतरावर वाहनाचे नियंत्रण सुटून ते जंगलातील झाडाला धडकले. त्यामुळे संशयित वाहन जागीच थांबले. पोलिसांनी वाहनातील इसमांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली.

या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत मोहसीन बाबू कुरणे, (वय ३० वर्षे, रा. निजा रोड स्टेशन, पालीना बिल्डिंग, रूम नं. २०३, मुंबई पूर्व) आणि सोहेलमिया अब्दुल माजिद शेख ( वय ४८ वर्षे, रा. जनता सेवक सोसायटी, रूम नं. ३०३, माहिम वेस्ट, मुंबई) यांचा आरोपी म्हणून समावेश आहे.

याशिवाय या प्रकरणात आणखी दोन संशयितांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यापैकी एकाचे पूर्ण नाव उपलब्ध नसून तो बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे राहणारा असल्याचे समोर आले आहे, तर दुसरा संशयित ‘देवा’ या नावाने ओळखला जात असून तो विरार येथील असल्याची माहिती नोंदविण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याकडून सुरू असून, आरोपींना पोलिस कोठडी रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Total Visitors :
4800053
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *