मंत्री उदय सामंत यांची माहिती
रत्नागिरी: महाराष्ट्राच्या क्रीडा जगतात पहिल्यांदाच प्रो गोविंदा साहसी खेळ स्पर्धेच्या रूपाने रत्नागिरीच्या भूमीत एक नवा ऐतिहासिक अध्याय लिहिला जाणार आहे. आगामी कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर, म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीमध्ये दहीहंडीचा थेट जागतिक विक्रम रचण्याची तयारी पूर्ण झाली असून, या थरारक आणि अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी रत्नागिरीकरांनी सज्ज व्हावे, असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. रत्नागिरीतील वाटद खंडाळा आणि साळवी स्टॉप येथील दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहून स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली.
या भव्य साहसी क्रीडा स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याचा ठसा उमटवणारे आणि जागतिक विक्रम नोंदवणारे विख्यात ‘जय जवान गोविंदा पथक’ तसेच ‘कोकण नगर गोविंदा पथक’ यात थेट सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारच्या अधिकृत प्रो गोविंदा साहसी स्पर्धेचे व्यासपीठ उपलब्ध होत असताना, ही दोन्ही बलाढ्य पथके मिळून तब्बल १० थरांचा ऐतिहासिक मानवी मनोरा उभारणार आहेत. दोन्ही संघ एकत्र येत १० थर लावून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित करणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. रत्नागिरीच्या क्रीडा संस्कृतीला आंतरराष्ट्रीय पटलावर नेऊन ठेवणारा हा थरार स्थानिक जनतेसह क्रीडाप्रेमींसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरणार आहे.






