रत्नागिरी: शहरातील डीएसपी बंगल्याजवळील पोलिस लाईन परिसरात चार वर्षांच्या निष्पाप चिमुकल्यावर भटक्या श्वानांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी नगरपरिषदेने शहरातील मोकाट श्वानांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. नागरिकांमधील वाढती भीती आणि सुरक्षिततेची निकड लक्षात घेऊन नगरपरिषदेकडून चंपक मैदानावर दीड हेक्टर जागेत अद्ययावत श्वान निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोठ्या स्वरूपातील हे केंद्र पूर्णत्वास जाईपर्यंत शहरवासीयांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी याच जागेतील ६ गुंठे जमिनीवर तात्पुरत्या स्वरूपातील निवारा केंद्र उभारले जात असून, ते येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्याधिकारी मयूर बेहरे यांनी दिली.
नगरपरिषदेच्या २०२४-२५ च्या अधिकृत सर्वेक्षणात शहरात सुमारे ३,६०० भटक्या श्वानांची नोंद झाली होती. यापैकी १,६०० श्वानांचे निर्बीजीकरण प्रशासनाने यशस्वीरीत्या पूर्ण केले असले, तरी लगतच्या ग्रामीण भागातून शहरात सातत्याने येणाऱ्या श्वानांमुळे त्यांची संख्या आटोक्यात ठेवणे नगरपालिकेसमोर मोठे आव्हान ठरत होते. यापूर्वी हे निवारा केंद्र कसोप ग्रामपंचायत हद्दीत उभारण्याचा प्रस्ताव होता; मात्र प्रत्यक्ष शहरालगतच चंपक मैदानाची दीड हेक्टर हक्काची जागा उपलब्ध झाल्यामुळे हा प्रकल्प शहरातच राबवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या नियोजित केंद्रात पिसाळलेले, गंभीर आजारांनी ग्रस्त तसेच अतिशय आक्रमक झालेल्या श्वानांची ‘ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’च्या सर्व मार्गदर्शक नियमांनुसार सुरक्षितपणे निगा आणि व्यवस्था राखली जाणार आहे. प्रकल्पाचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून चालू महिन्याअखेर त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होईल. वारंवार घडणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांना पूर्णपणे आळा घालण्यासोबतच श्वानांचे सुनियोजित व्यवस्थापन होणार असल्याने, प्रशासनाच्या या तत्पर निर्णयाचे शहरवासीय आणि प्राणीमित्र या दोन्ही घटकांकडून मनापासून स्वागत होत आहे.






