राज्यातील 100 पेक्षा अधिक लॉ कॉलेजांकडे बार कौन्सिलची मान्यता नाही

Gramin Varta
117 Views

पुणे : राज्यातील 100 हून अधिक विधी महाविद्यालयांकडे बार कौन्सिल ऑफ इंडियाची (BCI) मान्यता नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, सध्या विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने संबंधित महाविद्यालयांना मान्यता प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) मार्फत तीन वर्षे आणि पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयांचा समावेश करण्यापूर्वी शासन मान्यता, संबंधित विद्यापीठाची मान्यता तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता यांसह सर्व तांत्रिक बाबींची पडताळणी केली जाते.

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित येणाऱ्या विधी महाविद्यालयांची तपासणी करताना 100 हून अधिक महाविद्यालयांकडे बार कौन्सिलची आवश्यक मान्यता नसल्याचे स्पष्ट झाले. शिक्षणशास्त्र महाविद्यालयांप्रमाणेच विधी महाविद्यालयांचीही नियमित तपासणी करण्यात येते.प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन संबंधित महाविद्यालयांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता मिळविण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत मान्यता प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने संबंधित संस्थांना दिल्या आहेत.

Total Visitors :
4828012
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *