रत्नागिरी: भाटये महाजनवाडी येथे दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घातल्याचा आरोप; पतीविरोधात गुन्हा

Gramin Varta
195 Views

रत्नागिरी : भाटये महाजनवाडी येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड मारून तिला जखमी केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी गौरी कैलास भाटकर (वय ४१, रा. भाटये महाजनवाडी, रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास सुधीर भाटकर याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कैलास भाटकर हा दारूच्या नशेत नॉनव्हेज चायनीज डिश पार्सल घेऊन फिर्यादीच्या घरी आला होता. त्यावेळी गौरी भाटकर यांनी त्याला घरी येण्याबाबत विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपीने पत्नीला शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, त्यांचा मुलगा आराध्य याने वडिलांना आईला शिवीगाळ करू नका, असे सांगितले. त्यावेळी आरोपीने मुलाचा हात पकडून त्याला घराबाहेर रस्त्यावर नेले. हे पाहून गौरी भाटकर यांनी मुलाला हात लावू नका, आपले भांडण आपल्यातच आहे, असे सांगत मुलाला आरोपीच्या ताब्यातून सोडवून घेतले. याचा राग आल्याने आरोपीने तेथील दगड उचलून पत्नीच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गौरी भाटकर जखमी झाल्या.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८७/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ११८(१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वीच्या भारतीय दंड विधानातील कलम ३२४ व ५०४ अनुषंगानेही नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करीत आहेत.

Total Visitors :
4763161
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *