कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग; २० लाखांचे टायर खाक

Gramin Varta
193 Views

कोडोली : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आवळी फाटा येथे बुधवारी पहाटे टायरने भरलेल्या आयशर ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. बेळगावहून रत्नागिरीकडे निघालेला हा ट्रक अचानक दुभाजकाला धडकल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात ट्रक आणि त्यातील सुमारे २० लाख रुपये किमतीचे नवीन टायर जळून खाक झाले असून, सुदैवाने चालक येलगुंड यल्लाप्पा धनोरधर यांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेली माहिती अशी की, पहाटे साडेपाचच्या सुमारास हा ट्रक (क्रमांक KA. २२. AB-१६४३) आवळी फाट्यानजीक आला असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट दुभाजकाला जाऊन धडकले. या धडकेमुळे ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आगीची ठिणगी पडली आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे लोळ ट्रकमध्ये असलेल्या टायरपर्यंत पोहोचल्याने काही मिनिटांतच संपूर्ण वाहन आगीच्या विळख्यात सापडले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेतली. कोल्हापूर व मलकापूर येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन शर्थीचे प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली. या मदतकार्यात बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०२ रुग्णवाहिकेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या भीषण आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. कोडोली पोलीस या अपघाताचा आणि आगीच्या कारणांचा पुढील तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *