चिपळूण: राजकारण हे कधीही घाणेरडे नसते परंतु ते करणाऱ्यांनीच ते घाणेरडे केले असून राजकारणातील ही घाण बाजूला करण्याची मोठी जबादारी आता देशातील तरुणाईची असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव सचिन गायकवाड यांनी चिपळूण येथील एका विशेष कार्यक्रमात केले आहे. चिपळूणमधील डी.बी.जे. महाविद्यालय तसेच परिसरातील विविध महाविद्यालयांमधील सुमारे पन्नास ते साठ तरुणांनी मनसेच्या विद्यार्थी संघटनेत जाहीर पक्षप्रवेश केला असून जिल्हा सचिव सचिन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवलकर, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले, माजी शहराध्यक्ष श्री. गोंजारी, प्रसिद्ध वकील वृषाली सावंत व विनोद चिपळूणकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
चिपळूणमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे आता मोठ्या संख्येने कॉलेजचे तरुण पक्षात प्रवेश करत असून या पक्षप्रवेशासाठी तीन ते साडेतीन तास वाट पाहणाऱ्या तरुणांची पक्षावरील निष्ठा आणि प्रेम पाहून मनसेच्या इंजिनाला खऱ्या अर्थाने गती मिळाल्याचे दिसून येत आहे, असे श्री. गायकवाड यांनी सांगितले. चिपळूण शहरातील पाग, खेंड, कोलेखजन, गोवळकोट सती, खेर्डी, मालदोली आणि बावशेवाडी यासह विविध भागांमधून आलेल्या तरुणांनी मोठ्या उत्साहात हा प्रवेश केला असून तरुणांनी राजकारण आणि समाजकारणासोबतच प्रथम आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन करत पक्षाशी संबंधित कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वजण सदैव कटिबद्ध राहू असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.




