बारामती: महाराष्ट्रामध्ये ओबीसींचे कोणीच नाही या निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचलेले असून या पुढे ओबीसी जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही कार्यरत राहणार असल्याची घोषणा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली आहे. बारामतीत माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी या पुढील काळात ओबीसींचा लढा राज्यातील कोणत्याही पक्षाच्या सोबत लढणार नसून ओबीसी जनता पक्षाच्या माध्यमातून लढू असे सांगत नव्या राजकीय पक्षाचीच घोषणा केली. हाके यांनी नमूद केले की, आमच्यासोबत अनुसूचित जाती जमातीच्या बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
ओबीसींच्या प्रश्नावर आज कोणताच राजकीय पक्ष भूमिका घेत नसल्याने या नवीन पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रश्न मांडू. भाजपचे नाव आता फोडाफोडी पक्ष ठेवायला हवे असे सांगत प्रा. हाके म्हणाले, राज्यस्तरावर ओबीसींचे प्रश्न आम्ही प्रभावीपणे मांडू, विद्यमान कोणीही आमदार खासदार आम्हाला सोबत नको, सध्याचे विधानसभेतील ओबीसी चेहरे समाजाचे प्रश्नच मांडणार नसतील तर आम्हाला आमचा विचार करावाच लागेल. साठ टक्के लोकसंख्या ओबीसींची असतानाही कोणीही बोलत नसेल तर आम्हाला पर्याय द्यावाच लागेल, असेही ते म्हणाले. अठरा महामंडळांना अध्यक्ष व निधीही दिला जात नसेल तर सरकारचे हे अपयश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






