रत्नागिरी : तालुक्यातील फणसवळे गावात गुरांच्या कत्तलीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, गावाच्या हद्दीत बेवारस स्थितीत गुरांचे अवयव आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्लॅस्टिकच्या कापडात गुंडाळून टाकलेल्या या अवयवांची अवस्था अत्यंत भीषण असून, गुरांचे कातडे निर्दयीपणे सोलून काढल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, हा प्रकार कोणी आणि कोणत्या हेतूने केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि हे अवयव ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस यंत्रणा या गुन्ह्याचा कसून तपास करत आहे. या प्रकरणाच्या गांभीर्यावर बोलताना डीवायएसपी निलेश माईणकर यांनी सांगितले की, गुरांचे कातडे काढल्याचे दिसून येत असून, पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. दोषींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
