रत्नागिरी : ऊन, वारा आणि मुसळधार पावसाची तमा न बाळगता शहराची स्वच्छता राखणाऱ्या रत्नागिरी नगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा उपक्रम प्रभाग ५ मध्ये पार पडला. प्रभागातील रस्ते, नाले आणि वहाळ स्वच्छ ठेवून नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा जपणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कष्टाची दखल घेत नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी त्यांना रेनकोटचे वाटप केले आहे.
पावसाळ्यातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही हे कर्मचारी आपली सेवा अविरतपणे बजावत असतात. त्यांच्या याच निष्ठेचे कौतुक करताना नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी त्यांना ‘आरोग्यदूत’ अशी साद घातली. प्रभागाचा परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी राखण्यात या कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद करत, त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य असल्याचे मलुष्टे यांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान झाल्याची भावना व्यक्त होत असून, त्यांच्या मेहनतीला मिळालेली ही एक प्रकारची पोचपावती मानली जात आहे.
