पाली : स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रामीण भागात समाज प्रबोधन व सामाजिक ऐक्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ ही सुमारे दीडशे वर्षांपूर्वी रोवून रत्नागिरी तालुक्यातील पाली नजीकच्या कापडगाव गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ भाटलेकरवाडी यांनी ३२ कुटुंबाचा एक गणपती आणून समाजासाठी एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे आहे यातून त्यांनी सामाजिक ऐक्याचा एक वेगळाच संदेश जपलेला दिसत आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समाजाला एकत्र आणून सामाजिक व देश हिताचे कार्य करण्यासाठी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.त्याच धर्तीवर कापडगाव भाटलेकर वाडी येथील बुजुर्ग मंडळींनी एकत्र येऊन कोकणात आपल्याकडे असणाऱ्या घरगुती गणेशोत्सवापेक्षा आपले सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी वाडीतील सर्व कुटुंबांचा एकत्रित असा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून एक भावी पिढ्यांसाठी वेगळा आदर्श निर्माण केला आणि आता तीच परंपरा गेल्या दीडशे वर्षाहून अधिक काळ सातत्याने पुढील पिढ्यांनी टिकवून ठेवलेली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये केवळ गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची स्पर्धा अन्य मंडळांमध्ये लागली आहे मात्र या मंडळाने मात्र या स्पर्धेपासून दूर राहणे पसंत केले आहे. या मंडळाने ग्रामीण भागात असूनही
उत्सवाला सामाजिक कार्याची जोड दिलेली आहे.त्यामध्ये पारंपारिक भजन,जाकडी नृत्य,महिला व लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असे पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम मंडळामध्ये राबविण्यात येतात त्याचबरोबर मंडळाने सामाजिक दायित्वाच्या जबाबदारीतून समाजातील गरजू व्यक्तींना मदत व शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सहाय्य करून योगदान देत आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळात मंडळ रक्तदान व आरोग्य शिबिर ही राबवणार आहे.
पूर्वीपासून आमच्या भाटलेकर वाडीतील ३२ कुटुंबाचा एक गणपती हा कोणताही वाद विवाद न करता ११ दिवस सर्व एकत्र येऊन एकोप्याने साजरा करून श्री भाटलेकर वाडीचा राजाच्या उत्सवाची परंपरा आजही कायम राखत आहोत असे मंडळाचे प्रकाश भिकाजी कोत्रे,दिलीप लक्ष्मण कोत्रे,संदिप सहदेव कोत्रे, शशिकांत विश्राम कोत्रे यांनी बोलताना सांगितले.





