लांजा: येथील भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन “आजी आजोबांचा गाव” येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. कै.अरुणाताई पाटील व श्री देवेंद्र पाटील यांच्या कल्पनेतील पूर्ण झालेले स्वप्नं 21 ऑगस्ट 2021 रोजी पूर्ण झाले म्हणजेच गेली 4 वर्ष आजी आजोबांचा गाव या नावाने हे भाकर सेवा संस्थेमार्फत कोंड्ये येथे चालविले जात असून येथे निराधार,गरजू वृध्द आजी आजोबांना राहण्याची सुव्यवस्था,जेवणाची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.येथे हसते खेळते घरासारखे वातावरण, मनोरंजनाच्या सुविधा, वैद्यकीय सुविधा, डे – केअर सेंटर, मनसोक्त आनंद घेऊन जगण्याची इच्छा पूर्ण केली जाते.परकेपणाची कोणतीही जाणीव करून न देता स्वतःच्या आजी आजोबांच्या प्रमाणे काळजी घेतली जाते.
आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आजी आजोबांचा गाव येथे दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवसाची सुरुवात सनोफी पिरॅमल स्वास्थ्य संस्था मार्फत मेडिकल कॅम्प ने झाली. सदर शिबिरामध्ये सर्व वृद्धांचे संपूर्ण मेडिकल चेकअप करण्यात आले. त्या नंतर कार्यक्रमात आजी आजोबांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले.यात गरबा, संगीत खुर्ची, पिलो पासिंग, स्लो वॉक, अचूक बादली मध्ये बॉल टाकणे असे खेळ खेळले गेले. काही आज्यानी गाणी म्हणली. महीला पुनर्वसन केंद्रातील महिलांनी देखील यात सहभाग घेतला. त्यानंतर रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे श्री रेशम जाधव यांनी आजी आजोबांचे तसेच संस्थेच्या कार्यकर्त्यांचे देहदान व अवयव दानाचे फॉर्म भरून घेतले.एकाच वेळी 12 जणांनी देहदानाचे फॉर्म भरून एक मोठी सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला.या उपक्रमास खूप चांगला प्रतिसाद मिळाला.संस्थेमार्फत सर्व आजी आजोबा यांना फळांचे वाटप करण्यात आले.
आजी आजोबा यांनी संपूर्ण दिवस मजेत घालविला. या प्रसंगी समाजसेवक श्री. युयुत्सु आर्ते, भाकर सेवा संस्थेचे संचालक पवनकुमार मोरे, सचिव अश्विनी मोरे ,संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. भाकरचे फ्रंट लाईन वॉरियर्स शीतल धनावडे, पूर्वा सावंत, कोमल सोलिम, निकिता कांबळे, जनार्दन सावंत, मधुरा दळवी, सुरभी वाडेकर, ज्योती परब , अयांश मोरे, दैनिक सकाळ देवरुख चे प्रतिनिधी प्रमोद हर्डीकर उपस्थित होते.तसेच रत्नागिरी समाजकल्याण अधिकारी मा.श्री दीपक घाटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आजी आजोबा यांच्या सोबत चर्चा केली व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी आजी आजोबांच्या गाव मधील सर्व आजी आजोबा, कोंडये गावातील ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.






