GRAMIN SEARCH BANNER

नांदिवडे समुद्रकिनाऱ्यावर मृत मासे
परिसरात खळबळ

Gramin Varta
917 Views

जिंदाल कंपनीच्या विरोधात परिसरात संताप

रत्नागिरी :  रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे समुद्रकिनाऱ्यावर मासे मरून पडलेले आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.जिंदाल कंपनीने दुषित सांडपाणी नांदिवडे समुद्रकिनारी सोडल्याचा आरोप नांदिवडेचे माजी सरपंच गुरूनाथ सुर्वे यांनी केला आहे.

जिंदाल कंपनीकडून होणाऱ्या प्रदुषणामुळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त आहेत.जिंदाल पोर्ट मध्ये गॅस गळतीनंतर प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला होता.जिंदाल पोर्टच्या अंबुवाडीतील गॅस टर्मिनललाही ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे.अशावेळी आज नांदिवडेच्या समुद्रकिनाऱ्यावर मृत माशांचा खच पडलेला पाहायला मिळाला.समुद्र किनाऱ्यावर मासे मरून पडल्याची बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्याने खव्वय्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नांदिवडे गावचे माजी सरपंच गुरूनाथ सुर्वे आणि मच्छीमार रोहन सुर्वे यांनी आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन देत जिंदाल कंपनीने सोडलेल्या सांडपाण्यामुळे नांदिवडे किनाऱ्यावर मासे मरून पडले आहेत.तात्काळ हे प्रदुषित सांडपाणी बंद करावे आणि जिंदाल कंपनीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

अनेकांनी मासे खाणे बंद केले
ताज्या फडफडीत माशांसाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीत मृत मासे सापडल्याने खळबळ उडाली आहे.
नांदिवडे समुद्र किनारी मृत पडलेले मासे पाहून खव्वय्ये भयभीत झाले आहेत.अनेकांनी मासे न खाण्याचा निर्णय घेतला आहे.प्रदुषणामुळे जयगड परिसरातील मासेमारी संकटात सापडली असून भविष्यात मच्छिमार प्रदुषणाविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.

Total Visitor Counter

3073094
Share This Article