रत्नागिरी: “काय पैसे देऊन मत घेणाऱ्यांनी गावांचा विकास केला? एखादं उदाहरण सांगा,” असा थेट आणि बोचरा सवाल गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेने एका सोशल मीडिया पोस्टरद्वारे उपस्थित केला आहे. गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी ‘बिनधास्त बोल’ या उपक्रमांतर्गत गावातील आरोग्य, शिक्षण आणि रस्त्यांच्या दुरवस्थेवर बोट ठेवत घणाघात केला आहे.
गाव विकास समितीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर एक पोस्टर प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये निवडणूक काळात होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर टीका करण्यात आली आहे. “आरोग्य व्यवस्था चांगली झाली, शिक्षण सुधारले की रस्ते सुधारले?” असे प्रश्न विचारून खंडागळे यांनी गावातील विकासाच्या दाव्यांमधील फोलपणा उघड केला आहे.
या पोस्टरमध्ये एका बाजूला रात्रीच्या वेळी गावातील अपुऱ्या सुविधा, वर्गातील शिक्षण व्यवस्था आणि खड्डे पडलेल्या रस्त्यांची प्रतीकात्मक छायाचित्रे दाखवण्यात आली आहेत. यामधून ग्रामीण भागातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. निवडणुकीच्या काळात पैशाचे आमिष दाखवून मते विकत घेतली जातात, मात्र त्यानंतर गावांच्या मूलभूत समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते, असा सूर या मोहिमेतून उमटत आहे.
‘बिनधास्त बोल’ या शीर्षकाखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना विकासाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. निवडणुकीत कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आपल्या गावाच्या विकासासाठी काम करणाऱ्या योग्य उमेदवारालाच निवडून द्यावे, असे आवाहन एक प्रकारे या माध्यमातून करण्यात आले आहे. गाव विकास समितीच्या या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.




