रत्नागिरी: भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी भव्यदिव्य “एकता दौड” चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय एकात्मता, ऐक्य आणि सामूहिक शक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासोबतच, देशाच्या एकीकरणासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाला आदराने अभिवादन करणे हा या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
ही “एकता दौड” शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ठीक सकाळी ७.०० वाजता पोलीस परेड मैदान, रत्नागिरी येथून उत्साहात प्रारंभ होणार आहे. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते या दौडीचा औपचारिक शुभारंभ होईल. या राष्ट्रीय सोहळ्यात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, विविध शासकीय कार्यालयांमधील अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहून नागरिकांचा उत्साह वाढवतील.
पोलीस परेड मैदान येथून सुरू होणारी ही दौड जेल रोड चौक, जयस्तंभ, भाटये ब्रिज मार्गे भाटये समुद्र किनाऱ्यापर्यंत जाऊन, भाटये ब्रिज, जयस्तंभ, जेल रोड चौक मार्गे परत पोलीस परेड मैदानावर (समाप्ती) येईल.
या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी पोलीस कर्मचारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी, होमगार्ड्स यांच्यासह जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, युवक आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने या दौडमध्ये सहभाग नोंदवतील. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणाऱ्या या सामूहिक प्रयत्नासाठी रत्नागिरी पोलीस दलाने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. दौड मार्गावर वैद्यकीय सहाय्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रत्नागिरी पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या राष्ट्रभक्तीपर उपक्रमात उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवून राष्ट्रीय ऐक्य, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश अधिकाधिक दृढ करावा.






