GRAMIN SEARCH BANNER

कोल्हापूर : बिबट्याचा हल्ला नव्हे, तर वृद्ध दाम्पत्याला थंड डोक्याने संपवलं

Gramin Varta
1.1k Views

रत्नागिरीतून संशयिताला घेतले ताब्यात

कोल्हापूर: कोल्हापुरातील शाहूवाडी तालुका काही दिवसांपूर्वी बिबट्याने वृद्ध दाम्पत्यावर केलेल्या हल्ल्याच्या घटनेने हादरला होता. या घटनेतील वृद्ध कंक दांपत्य बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले की त्यांची हत्या झाली?

याबाबत शंका उपस्थित होत होत्या. मात्र कंक दाम्पत्याच्या मृत्यूभोवतीचे गूढ अखेर उलगडले आहे. सुरुवातीला हा मृत्यू बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यामुळे झाला असल्याचे चित्र उभे राहिले होते. मात्र पोलीस चौकशीतून आता हा थंड डोक्याने रचलेला दुहेरी खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींपैकी एकास पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर दोघांचा शोध सुरू आहे. शुक्रवारी या गुन्ह्याचा पूर्ण उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाईपैकी गोळीवणे वसाहतीमध्ये 19 ऑक्टोबर 2025 रोजी 75 वर्षांचे निनू यशवंत कंक आणि 69 वर्षांची पत्नी रखुबाई कंक यांच्या मृतदेहांबाबत थरारक प्रसंग उघड झाला. कडवी धरणाजवळ त्यांच्या शेडजवळील शेतात त्यांचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले. सुरुवातीला वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा मृत्यू जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झाला असावा असे वाटले. विशेषत: बिबट्यासंदर्भातील प्राथमिक अंदाज उपस्थित होता. मात्र वनविभागानेही नंतर ही शक्यता फेटाळली आणि पोलिसांनी नव्याने तपास करण्यास सुरुवात केली.

तपासात आलेले महत्त्वाचे धागेदोरे

पोलीस तपासादरम्यान काही विचित्र बाबी समोर आल्या. प्राण्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. शेताजवळ शेळी, मेंढ्या, कुत्रे असताना फक्त या दाम्पत्यांवरच प्राण्यांचा हल्ला कसा शक्य? मृतदेहांवर प्राण्यांच्या पंजांचे ठसे किंवा ओरबडल्याच्या खुणा का नव्हत्या? तसेच दोन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळले, याचा काय अर्थ? या प्रश्नांमुळे पोलिसांना संशय बळावला आणि त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या दोन पथकांसोबत तळ ठोकून तपास सुरू ठेवला.


पोलिसांकडून संशयिताला अटक

आठवडाभराच्या सखोल तपासानंतर पोलिसांनी रत्नागिरी येथून एका संशयिताला ताब्यात घेतला आहे. संशयिताने चौकशीत खुनाचा खुलासा केला असून अन्य दोन तज्ज्ञ मारेकऱ्यांचा शोध पोलीस प्राधान्याने घेत आहेत. प्राथमिक तपासात या खुनामागे पूर्ववैमनस्याचा भाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांनी मिळून ही घातक योजना आखली होती, ज्यात निनू कंक यांचा खून करून त्यांच्या मृतदेहाला धरणाजवळ असलेल्या जलाशयात फेकण्याचा हेतू होता. तर रखुबाई कंक यांचा खून जवळच्या ठिकाणी करून हा मृत्यू जंगली प्राण्यांच्या हल्ल्यासारखा भासविण्याचा प्रयत्न केला गेला.

शेतकरी दाम्पत्याच्या हत्या प्रकरणातील पुढील कारवाई

शाहूवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी गोपनीयतेने तपास करत असून लवकरच गुन्ह्याचा खुलासा केला जाईल. तसेच इतर सर्व शंका दूर केल्या जाणार आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक जनतेमध्ये न्याय मिळेल, या अपेक्षाही वाढल्या आहेत. पोलिसांनी स्थानिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळेल, असे आश्वासन दिले आहे.

Total Visitor Counter

3200652
Share This Article