रत्नागिरी : शहराजवळील चिंचखरीकडे जाणाऱ्या काजरघाटीच्या धोकादायक वळणावर शनिवारी सायंकाळी जीवघेणा अपघात झाला. चिंचखरी एसटी बस तीव्र उतार आणि अरुंद वळणावर येताच चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट दरीकडे घसरू लागली. काही क्षणात ती दरीत कोसळणारच इतक्यात—रस्त्याकडील एका मजबूत झाडाला बस धडकली आणि जागच्या जागी थांबली!
या थरारक प्रसंगाने प्रवाशांचा हृदयाचा ठोका चुकला, किंकाळ्या सुरू झाल्या, जीव जाते की काय अशी भिती सर्वांनाच वाटू लागली. परंतु सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
बस रत्नागिरीहून चिंचखरीकडे निघाली होती. काजरघाटीचा रस्ता तीव्र उतार, ‘हेअर-पिन’ वळणं आणि खोल दरींसाठी कुख्यात आहे. बस जेव्हा त्या घातक वळणावर पोहोचली, तेव्हा अचानक समोर आलेल्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात किंवा तांत्रिक बिघाडामुळे चालकाचा ताबा सुटल्याचे सांगितले जात आहे.
बस क्षणातच डावीकडे घसरू लागली. दरीचा खोल काळोख समोर दिसू लागला. प्रवाशांनी किंचाळायला सुरुवात केली—सर्वांना आता अखेरचा क्षण आला, असे वाटू लागले. पण तेवढ्यात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या, घट्ट मुळांच्या झाडाला जोरदार धडकली. त्या झाडाने बसला आधार दिला आणि जिवघेणा अपघात टळला. झाड नसते, तर बस दरीत कोसळून भयावह दुर्घटना घडली असती, असा तिथल्या लोकांचा सांगण्याचा सूर आहे.
धडक झाल्यानंतर बसमधील बहुतांश प्रवासी सुरक्षित होते, तर काहींना किरकोळ दुखापत झाली. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी धावले. कोणतीही साधने नसतानाही ग्रामस्थांनी मनुष्यबळाच्या जोरावर प्रचंड धैर्याने बचावकार्य सुरू केले.
स्थानिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींना तात्पुरता प्रथमोपचार देण्यात आला. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
रत्नागिरी : काजरघाटी येथे बसला अपघात, सुदैवाने झाडाला अडकल्याने जीवितहानी टळली






