टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘ज्ञानेश्वर माऊली-तुकाराम’चा जयघोष; शास्त्री नदीच्या तीराला लाभले भक्तिमय वातावरण
शास्त्रीपुल / वहाब दळवी : संगमेश्वर परिसरातून वाहणाऱ्या पवित्र शास्त्री नदीच्या तीरावर वसलेल्या बावीस गावांतील वारकरी बंधू-भगिनी, बालके आणि भाविकांच्या सहभागाने ‘शास्त्री तिरी संत वारकरी संप्रदाय, संगमेश्वर बावीस गाव’ यांच्या वतीने श्रावण महिन्यातील पहिली वारकरी दिंडी सोमवारी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाली. श्री विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषाने, टाळ-मृदुंगाच्या गजराने आणि अभंगांच्या स्वरांनी संपूर्ण संगमेश्वर परिसर दुमदुमून गेला.
दिंडीची सुरुवात रामपेठ येथील श्रीराम मंदिरातून करण्यात आली. यावेळी श्रीराम सेवा मंडळ कमिटीच्या वतीने प्रशासक विवेक शेरे यांच्या हस्ते दिंडीचे अध्यक्ष काशीराम साळवी यांचा पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रामपेठ येथील नाना कोळवणकर, चोचे आदी उपस्थित होते.
यानंतर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर तसेच साप्ताहिक ‘पोलीस तपास’चे उपसंपादक दिनेश अंब्रे यांनी वारकरी संतांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गावित यांचा वारकरी संप्रदायाच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. पोलीस हेडकॉन्स्टेबल विनय मनवल यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
विठ्ठल नामाचा जयघोष आणि अभंगगायन करत दिंडी आठवडा बाजार मार्गे श्री देव गणपती मंदिरात पोहोचली. मंदिर मंडळाच्या वतीने प्रमोद भिंगार्डे, रमेश नारकर, जितेंद्र प्रसादे, मंदार खातू, शशांक खातू, राहुल कुचेकर, उदय संसारे आदींनी दिंडीचे स्वागत केले. यावेळी दिंडी अध्यक्ष काशीराम साळवी व माजी अध्यक्ष काशीराम भूरवणे यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. भाविकांना प्रसाद म्हणून लाडूचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर दिंडी श्री निनावी देवी मंदिरात पोहोचली. निनावी देवी प्रासादिक मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम बाबा सुर्वे यांनी विणेची पूजा करून दिंडीचे स्वागत केले. यावेळी वारकरी भक्तांनी देवीचा जागर सादर केला. भाविकांना फळवाटपही करण्यात आले.
मुख्य बाजारपेठेतून दिंडी पुढे मार्गस्थ होत असताना ‘ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम’, ‘सद्गुरुराय’, ‘निवृत्ती राया’, ‘सोपान’, ‘मुक्ताबाई’, ‘ज्ञानसखया’ अशा संतपरंपरेच्या जयघोषाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. ‘राम कृष्ण हरी’, ‘माऊली… माऊली’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
सोनवी पूल परिसरातून लाकूड गिरणी हायवे मार्गे जाखमाता मंदिर येथे दिंडीचे स्वागत करण्यात आले. रुपेश शेटे यांनी वारकऱ्यांसाठी चहा-नाश्त्याची सेवा दिली. पुढे कसबा येथील संभाजी स्मारक परिसरात वारकऱ्यांनी गोल रिंगण करून हरिनामाचा जयघोष केला. या सोहळ्यामुळे नागरिकांनाही वारकरी परंपरेतील रिंगणाचे दर्शन घडले.
त्यानंतर दिंडीचे कर्णेश्वर मंदिरात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक व पंचायत समितीचे माजी सभापती बंडाशेठ महाडिक यांनी वारकऱ्यांसाठी चहापाण्याची व्यवस्था केली. कर्णेश्वर येथेही भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळा पार पडला.
यानंतर संगम काशीद क्षेत्रातील श्रीराम मंदिरात दिंडीने दर्शन घेतले. येथे बेडेकर गुरुजी यांनी वारकऱ्यांना फराळाचे वाटप केले. तसेच मंगलमूर्ती ट्रेडर्स, गणेश ट्रेडर्सचे रहाटे बंधू, आप्पा इंदुलकर आणि दिलीप शेठ रहाटे यांच्यासह विविध सेवाभावी व्यक्तींनी वारकऱ्यांसाठी सेवा बजावली.
दिंडीच्या संपूर्ण मार्गावर विविध ठिकाणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, महिला-भगिनी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील विविध घटकांनी सेवाभावाने सहभागी होत वारकऱ्यांसाठी पाणी, प्रसाद, चहा-नाश्ता व फळवाटपाची व्यवस्था केली.
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितेश केणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाने दिंडीच्या सुरळीत आयोजनासाठी सहकार्य केले. त्यामुळे संपूर्ण दिंडी सोहळा उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
श्रावण महिन्यातील या दिंडी सोहळ्यामुळे शास्त्री नदीच्या तीराला जणू प्रति पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाल्याचा अनुभव भाविकांना आला. टाळ-मृदुंग, अभंग आणि हरिनामाच्या जयघोषाने शास्त्री नदीचा परिसर भक्तिरसात चिंब झाला. या दिंडीमुळे शास्त्री नदीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला नवी अधोरेखित झाल्याची भावना परिसरवासीयांनी व्यक्त केली. दिंडीच्या सांगतेनंतरही संगमेश्वर परिसरात भक्ती, चैतन्य आणि वारकरी परंपरेचा उत्साह कायम राहिला.
संगमेश्वर येथे शास्त्री नदीच्या तिरी वारकरी दिंडी उत्साहात संपन्न
Leave a Comment





