रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने सुहेल मुकादम यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून ते प्रभाग क्रमांक १६ ब मधून निवडणूक लढवणार आहेत.
सुहेल मुकादम यांनी यापूर्वीही याच प्रभागातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना नगर परिषदेच्या महत्त्वाच्या आरोग्य, पाणी आणि नियोजन समितीच्या सभापतीपदी काम करण्याची संधी मिळाली होती. या तिन्ही समित्यांची जबाबदारी सांभाळताना त्यांनी नागरिकांना न्याय देण्याचा आणि त्यांची कामे मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
त्यांच्या मितभाषी व्यक्तिमत्त्वाची रत्नागिरीमध्ये ख्याती असून ते गेली ३५ वर्षे सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी ‘आश्रय जेष्ठ नागरिक संघटना’ स्थापन केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सुमारे ४५० ज्येष्ठ नागरिकांना सदस्य बनवून त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. तसेच, ते वर्षभरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. याव्यतिरिक्त, ते संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या संस्थेच्या सल्लागारपदी देखील सक्रिय आहेत.
सुहेल मुकादम यांच्या या भरीव कामाची नोंद पालकमंत्री मा. डॉ. उदय सामंत यांनी घेतली आणि त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी बहाल केली. त्यामुळे विविध संस्था, संघटना आणि मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते, तसेच सकाळपासूनच सुहेल मुकादम यांचे समर्थक मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत हजर होते. प्रभागातील मतदारांनी त्यांच्या कामावर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा एकदा नगरसेवकपदी विराजमान करण्याचा चंग बांधला असल्याचे दिसून येत आहे.







