अकोला: अचलपूर, दर्यापूर परिसरात पहिल्या कापूस वेचणीत प्रतिएकर तीन ते सहा क्विंटलपर्यंत उत्पादन हाती आले आहे. मात्र, वाढत असलेल्या थंडीमुळे कापूस वेचणीचा वेग मंदावणार असल्याचे बोलले जात आहे.
तसेच, कापूस वेचणी मजुरीचे दर घटल्यामुळे परराज्यातून आलेल्या शेतमजुरांना रोजगार शोधण्याची वेळ येऊ शकते.
चालू हंगामातील खरीप पेरणी मृग नक्षत्रात सुरू होऊन आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाली. पूरबाधित क्षेत्र वगळता तालुक्यातील बहुतांश पेरण्या यशस्वी झाल्या.
दिवाळीच्या सुमारास कापूस वेचणीला सुरुवात झाली असताना अचानक अवकाळी पावसाने पुन्हा वेचणी ठप्प झाली. त्यानंतर मजुरांची टंचाई भासू लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेजारच्या राज्यांतून मजूर बोलावून वेचणी पूर्ण केली. अपवाद वगळता या पहिल्या वेचणीत अनेकांना समाधानकारक उत्पादन मिळाले आहे.गत आठवड्यात थंडीचा जोर वाढल्याने कपाशीची बोंडे उघडण्याची प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे पुढील १५ ते २० दिवस कापूस वेचणी थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत यापूर्वी १२ ते १३ रुपये किलो असलेली मजुरी आता ९ ते १० रुपयांवर आलेली आहे. परिणामी, बाहेरून आलेल्या शेतमजुरांना पर्यायी रोजगाराचा शोध घ्यावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
थंडीमुळे कापूस फुटण्याचा वेग मंदावला; उत्पादन घटण्याची शक्यता





